लोणवाडी, ता. जळगाव –(प्रतिनिधी)- तालुक्यातील लोणवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात माहितीच्या अधिकाराचे (RTI) शस्त्र प्रभावी ठरले असून, एका जागरूक अर्जदाराने अर्ज दाखल करताच अवघ्या तीन दिवसांत ग्रामपंचायतीने गावात कचरा संकलनासाठी डस्टबिन (Dustbin) बसवले आहेत. ग्रामस्थांनी या जलद कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.



ॲड. अरुण शिवाजी चव्हाण यांनी मागणी केलेली माहिती- लोणवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन गावात डस्टबिन बसविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे, याबाबत सविस्तर माहिती मिळावी, जसे की,

१) सदर काम कोणत्या निधी अंतर्गत करण्यात आलेले आहे, यासाठी प्राप्त निधी व खर्च निधी, बाबत माहिती मिळावी.

२) डस्टबिन खरेदी प्रक्रियेची माहिती बिले व अदा केलेली देयके सह मिळावी.

३) डस्टबिन गावात कोण-कोणत्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या आहेत त्याबाबत चे Google Location सह Latitude & Longitude चे फोटो मिळावेत.

४) डस्टबिन खरेदी बाबत ग्रामपंचायत ठरावाची प्रत मिळावी, या माहितीची मागणी करताच तीन दिवसांतच लोणवाडी ग्रामपंचायतीकडून गावात कचरा संकलनासाठी डस्टबिनची सोय करण्यात आलेली आहे.

अशी माहिती मिळण्याकामी दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी लोणवाडी ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकाराचा अर्ज (RTI Application) दाखल केला होता. ग्रामपंचायतीने या कामासाठी निधी खर्च करण्यात आलेला होता परंतु प्रत्यक्षात गावात काम झालेले नसल्याचे अर्जदार यांच्या लक्षात आल्याने व गावातील कचरा संकलनाची व्यवस्था योग्य नसल्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून येत होत्या. अर्जदाराने माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून वरील माहिती मागितली होती. अर्ज दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच म्हणजेच ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लोणवाडी गावात विविध ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी आवश्यक डस्टबिन बसवण्यात आले आहेत.

माहिती अधिकाराचा अर्ज प्राप्त होताच ग्रामपंचायतीने दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद असून, यामुळे गावातील कचरा व्यवस्थापनाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर त्वरित तोडगा निघाला आहे. ॲड. चव्हाण यांच्या माहिती अधिकाराच्या प्रभावी वापरामुळे गावात स्वच्छता राखण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयामुळे लोणवाडी गावात आता सार्वजनिक ठिकाणी जमा होणारा कचरा योग्यरित्या संकलित करण्यास मदत होणार असून, यामुळे निश्चितच गाव पातळीवरील स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यास हातभार लागणार आहे.












