वरणगाव – लॉक डाऊनच्या काळात गेल्या आठ ते दहा दिवसापासून वरणगाव शहरासह परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा आणि रात्री-बेरात्री खंडित होणारा वीज पुरवठा त्वरित सुरडीत करावा, या मागणीचे निवेदन आज 2 मे रोजी येथील महावितरणचे सहायक अभियंता अखिलेश कुशवाह यांना शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आले.
निवेदनावर नमुद करण्यात आले आहे की, संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्गने हाहाकार माजवला आहे. संसर्ग थांबवण्यासाठी राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. या लॉक डाऊनमध्ये वरणगावसह परिसरात दिवसा, रात्री बेरात्री केव्हाही वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने नागरिकांना वीज खंडीत झाल्यावर घराबाहेर पडल्याशिवाय पर्याय नसतो. नागरिक घराबाहेर निघाल्यावर पोलीस दंडुके मारतात. तसेच मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना सुरु आहे. अशा वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमुद केले आहे.
आम्ही दिलेल्या निवेदनाचा विचार करून वीज पुरवठा सुरडीत करण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी आंदोलन करेल असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदनावर राष्ट्रवादीचे न.पा.गटनेते नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक हरी मराठे, शहराध्यक्ष संतोष बळीराम माळी, नगरसेवक विष्णू नेमीचंद खोले, गणेश सुपडु चौधरी, रवींद्र शांताराम सोनवणे,साजिद कुरेशी अल्पसंख्यांक जिल्हा संघटक पप्पू जकातदार, शेख फराज, शेख रीजवान, इद्रिस खान, माजी ग्रा. प. सदस्य प्रकाश नारखेडे, राजेश पंडित चौधरी, ओबीसी तालुकाध्यक्ष गजानन वंजारी, शेख एहसान, पवन मराठे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.