अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू मुळे संपूर्ण जगात महामारीचे सावट दिसू लागले असून ते थांबवण्यासाठी सरकारने जनतेला घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. साधारण दोन महिन्यांपासून संपूर्ण बंद आहे. त्यामुळे देशातील गरीब जनतेला ह्याचा सर्वात जास्त फटका बसला असून ज्या लोकांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर भूकमारीची वेळ येत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी सामाजिक अंतर पाळत प्रशासनास सहकार्य केले. पण बांधकाम क्षेत्रात काम करण्याऱ्या कारागीर व मजूर, कचरा वेचनारे, घरकांम करणाऱ्या महिला, निराधार वृद्ध, सफाई कामगार या लोकांचे काम बंद झाल्याने त्यांना अर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन कृती फाऊंडेशन अहमदनगर यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी जाऊन अशा गरजूंपर्यंत घरपोच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. सदर उपक्रम संजय बेल्हेकर, निलम बेल्हेकर, निलेश खरपुडे, कोमल खरपूडे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. खरे पाहता मनुष्यजीवनाची इमारत ही सत्कर्माच्या बळावरच उभी असते. गरजूंना संकट काळात मदत हे देखील सत्कर्माचे एक उत्कृष्ट स्वरूपच आहे. असे यावेळी फाऊंडेशनचे निलम बेल्हेकर यांनी बोलताना सांगितले.