जळगांव(प्रतिनिधी)- केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिर एम.जे.कॉलेज जळगाव येथे शिक्षकांसाठी अध्यापक प्रबोधनी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रजापिता ब्रह्मकुमारीय विश्व विद्यालय जळगाव यांच्या मार्फत कुमारी वैष्णवी दिदी व कुमारी निकिता दिदी यांनी याप्रसंगी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
सुख हे क्षणासाठी असते आणि आपण हेच फार चुकीच्या ठिकाणी शोधतो आणि त्यामुळेच आपल्याला दुःखाला सामोरे जावे लागते. आपण विज्ञानामध्ये खूप सारी प्रगती केली त्याचबरोबर काही दुःख आणि संतापही विकत घेतलेला आहे . आपण ज्या प्रमाणे आपल्या शरीराची काळजी घेतो त्याप्रमाणेच आपल्या मनाची काळजी घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. योगाच्या माध्यमातून आपण आपlले हे मन स्थिर ठेवू शकतो व चिरंतर सुखाचा उपभोग घेऊ शकतो. संताप ही नैसर्गिक प्रक्रिया नाही तिला आपण आपल्या बुद्धीनुसार ताब्यात ठेवू शकतो आपल्या मनातील जे विचार आहेत हे सर्व विचार आपण वापरत असलेल्या सर्व वस्तू मधून आपल्या घरातील व्यक्ती , आपले स्नेही , आपले मित्र परिवार या सर्वांमध्ये आपले हे विचार हस्तांतरित होत असतात आणि म्हणूनच आपले विचार सकारात्मक असणे हेच महत्त्वाचे आहे. नकारात्मक विचारांनी आपल्या मनामध्ये घर केलेले आहे व ते विचार सहजासहजी जाणे अशक्य असते त्यासाठी आपल्याला योग साधना करणे हे खूप गरजेचे असते.
आपण शिक्षित झालो परंतु सुशिक्षित होण्यासाठी म्हणजेच ज्ञान प्राप्ती करण्यासाठी शिक्षणाबरोबरच माहिती व त्या माहितीचे योग्य विचार असणे गरजेचे असते. ज्या वेळेस आपला स्वभाव आपल्याला समजेल त्यावेळेसच आपण इतरांसाठी आपल्या पूर्ण समर्पकतेने आपले कार्य आपण करू म्हणजेच आपले काम आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद देणारे ठरेल. अशा शब्दात कुमारी वैष्णवी दिदी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अंती सर्वांना राखी बांधून आपल्या मनातील एक नकारात्मक विचार घालवण्याचा संकल्प करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन योगेश भालेराव यांनी केले तर प्रसंगी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी व मुख्याध्यापिका रेखा पाटील उपस्थित होते.