पुणे(प्रतिनिधी)- कोरोना काळात आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण नवीन संशोधनाची गरज आपल्या लक्षात आली असून त्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील 3 टी एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीनचे उद्घाटन मंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी सहकार राज्यमंत्री तथा भारती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, खासदार प्रफुल्ल पटेल, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट माजी आमदार श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.
माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करुन शिक्षण क्षेत्रात खूप मोठे काम केले असे सांगून श्री. ठाकरे म्हणाले, त्यांनी दूरदृष्टीने उभ्या केलेल्या विद्यापीठाच्या रुग्णालयाने या काळात हजारो कोविड बधितांना बरे केले आहे. विद्यापीठाने डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिनिमित्त उभारलेले वास्तुसंग्रहालय हे राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पहायला खुले करावे, जेणेकरुन त्यांनी केलेल्या संघर्षाचा आणि कार्याचा आदर्श पुढील पिढीला घेता येईल असे त्यांनी सांगितले.