जळगाव, दि.9 (जिमाका वृत्तसेवा) :- :- राज्यातील विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींनी शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन सोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करणे. तसेच संवाद अभियान-युवा संवाद यासारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता आता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यासाठी समान संधी केंद्रे (Equal Opportunity Centre) स्थापन करण्याचे समाज कल्याण विभागाने ठरविले आहे. त्यासंदर्भात मा. मंत्री, सामाजिक न्यय व विशेष सहाय्य विभाग यांनी नुकतेच निर्देशीत केले आहे.
राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहाय्यक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच “ समान संधी केंद्रे” सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासन पुरस्कुत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित विकासासह त्याचे सर्व मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकास व व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने या केंद्राच्या माध्यमातून उपायोजना करण्याचे ठरवले आहे. सदर “ समान संधी केंद्रेच्या” माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबींचा सर्वसमावेशक मार्गदर्शक याव्दारे करण्यात येणार आहेत.
यासंदर्भात मा. आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांनी दि. 3 फेब्रुवारी, 2022 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये राज्यातील समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय तसेच इतर सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये या स्वरुपाची केंद्रे तात्काळ चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालय चालू नसले तरी प्रत्येक महाविद्यालयाने सदर “ समान संधी केंद्राची” स्थापना करुन महाविद्यालय निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करुन त्यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करावा किंवा इतर समाज प्रसार माध्यमांचा वापर करुन संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्याशी समन्वय करणे बाबत सुचित करण्यात आले आहेत. याबाबत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व प्राचार्यांच्या ऑनलाईन बैठका घेण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्रे, ( Equal Opportunity Centre) स्थापन करण्याचे आवाहन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.