जळगाव दि 26(प्रतिनिधी): जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात “हर घर जल उत्सव” विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या अंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.
जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे.या कार्यक्रमांतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणी द्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन शुद्ध आणि शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी ही योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या भागीदारीतून राबवली जात आहे.
या योजनेत 100% वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडणी पूर्ण करणाऱ्या गावांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.याबाबत शासनाच्या सूचनेनुसार विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात ग्रामपंचायत ‘हर घर जल’ घोषित करण्याचा ठराव करणे,गावात ‘हर घर जल उतसव’ साजरा करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करणे,लोककलांचा वापर करून जनजागृती करणे, पाणी गुणवत्ता तपासणीसाठी विशेष मोहीम राबवणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.तसेच उत्सवांमध्ये गावातील पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा,अंगणवाडी,आरोग्य केंद्र इत्यादी सर्व घटकांना सहभागी करून घेणे आदी उपक्रम राबवणे बाबत सूचना आहेत.हा उपक्रम राबविण्याबाबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षा तर्फे तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया आणि जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक स्नेहा कुडचे यांनी केले आहे.