जळगाव-(प्रतिनिधी)– रावेर तालुक्यातील धुरखेडे गावातील ३५ पुनर्वसनधारक कुटुंबांनी पुनर्वसनासाठी मंजूर असलेल्या भूसंपादन प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले आहे. प्रस्ताव क्र. २३७/२०१८ नुसार पुढील १५ दिवसांत जमीन मोजणी व भूसंपादन प्रक्रिया सुरू न झाल्यास संपूर्ण ३५ कुटुंबे जळगाव येथे आमरण उपोषणास बसतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.


पुनर्वसनधारकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून १८ मार्च २०२५, १० मे २०२५, ४ जून २०२५ तसेच ८ ऑगस्ट २०२२ रोजी जमीन मोजणीचे कार्यक्रम निश्चित करण्यात आले होते. मात्र, प्रत्येक वेळी अधिकारी घटनास्थळी येऊन कोणतीही मोजणी न करता परत गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे प्रशासनाकडून सातत्याने टाळाटाळ होत असून गरीब व मजूर कुटुंबांची थट्टा केली जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.


निवेदनात नमूद केल्यानुसार, शासनाने यापूर्वी शासकीय जमिनींची पाहणी केली असता त्या पुनर्वसनासाठी अयोग्य व धोकादायक असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर खाजगी जमिनीचा प्रस्ताव २००९-१० मध्ये तयार करण्यात आला. त्याच अनुषंगाने २०१८ मध्ये सुधारित भूसंपादन प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
धुरखेडे परिसरातील विद्यमान वस्ती तापी नदीलगत असून मोठ्या नाल्यांनी व दऱ्यांनी वेढलेली आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास संपूर्ण परिसर पाण्याने वेढला जातो. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास सतत धोका निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात एका दुर्दैवी घटनेचाही उल्लेख केला आहे. पावसाळ्यात घराची भिंत कोसळून पार्वताबाई भागवत अटकाळे (वय ७२) यांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत, अशा घटनांनंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यात घरांमध्ये विषारी साप व विंचू निघत असल्याने नागरिक भयग्रस्त वातावरणात जीवन जगत असल्याचे सांगण्यात आले.
पुनर्वसनधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन मोजणीची नवीन तारीख तातडीने जाहीर करून पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याची मागणी केली आहे. तसेच १५ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास सर्व ३५ कुटुंबे जळगाव येथे आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा देण्यात आला आहे.










