समाजामध्ये वावरत असताना आपला अनेक लोकांशी संबंध येत असतो. त्या समूहामध्ये काही पुरुष तर काही स्त्रियाही असतात. त्यामध्ये काही पुरुष स्त्रियांकडे आकर्षित होतात,तर काही स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होत असतात. त्यामधील आकर्षण हे सुंदर आणि उठावदार असेल तरच पुरुष स्त्रियांकडे आकर्षिला जातो. याउलट स्त्रिया पुरुषांच्या कर्तृत्व आणि जबाबदारीकडे विशेष आकर्षित होतात. रोजच्या जीवनामध्ये प्रेमाला खुपच महत्व आहे. काहीजण प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असतात. प्रेमासाठी काहीजण जगतात तर काही जण प्रेमासाठी एखाद्याला मारायला पण मागे-पुढे पाहात नाहीत. एखादी व्यक्ती आवडणे आणि एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असे म्हटले जाते,की खरे प्रेम एकदाच होत; पण आजकाल प्रेमाचे स्वरुपच बदलले दिसते. कारण कोण चैन करण्यासाठी, कोण टाईमपास करण्यासाठी, कोण एकटेपणा दूर करण्यासाठी तर कोणी चँलेज म्हणून प्रेम करताना आढळतात, त्यामुळे आता खरे प्रेम किती वेळा होऊ शकते, हे सांगता येणे अशक्य आहे. खरे प्रेम दीर्घकाळ टिकणारे आणि परिपक्व असे असते आणि क्षणभंगूर असते ते खरे नसते. आपल्याला होणारे प्रेम हे कशा प्रकारचे असते आणि कसे होते ते जाणुन घ्या.
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं” ‘तुमचं आमचं अगदी सेम असतं’ असे आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल; पण “प्रेम म्हणजे पुरुष व स्त्री अशा दोन व्यक्ती आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास योग्य जोडीदार समजू लागतात, तेव्हा त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. ‘तेव्हा तुमचं आमचं प्रेम सेम नसतं’ प्रत्येक व्यक्तिचे होणारे प्रेम हे वेगवेगळे असते. प्रेम हे विशिष्ट छटांमधुन होत असते.प्रत्येकाने आपण कोणत्या छटांमधुन प्रेम करतो हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक जोडीदारांना आपले प्रेम खरे आहे, परिपूर्ण आहे आणि ते शेवटपर्यत टिकावे असे वाटत असते. प्रेमामध्ये प्रमुख तीन वैशिष्ट्यांचा सहभाग असतो.
१) जवळीकता:-
” दोघांनापण एकमेकांच्या जवळ राहण्यासाठी असणारी भावना म्हणजे जवळीकता होय.” ही वैशिष्ट्ये असणारी व्यक्ती एकमेकांचे चांगले व्हावे अशी इच्छा असते.जोडीदाराची मने ओळखतात. त्यांचा आदर ठेवतात व त्यांच्यावर अवलंबून असतात. एखादी गोष्टी जोडीदाराला आवडत नसेल तर ती करण्याचे टाळतात.
२) उत्कटता:-
यामध्ये शारीरिक आकर्षण लैंगिक जवळीकता आणि प्रेमाची भावना मोठ्या प्रमाणात असते.
३) बांधिलकी:-
जोडीदाराशी माझेपण प्रेम आहे आणि आमचे परस्पर संबंध टिकवून ठेवणे ही माझी पण जबाबदारी आहे. यातच बांधिलकी येत. यामध्ये जबाबदारीच्या स्वीकार आणि आयुष्यभराची साथ देण्याची भावना असते. जवळीकता उत्कटता आणि बांधिलकी या तीन वैशिष्ट्यांच्या आधारातून प्रेम ही परिपूर्ण कल्पना तयार होते. “प्रेम हे संपणारच असतं हे माहीत असतं,तरी पण ते आपण करतो कशाला.’ हे ‘मितवा’ मधील प्रसिद्ध वाक्य आहे . तर प्रत्येकाचे प्रेम या वाक्यांप्रमाणेच संपू नये असे वाटत असेल तर आपण आपले प्रेम दीर्घकाळ टिकवण्यासाठी खालील प्रकार लक्षात घ्यावे.
१) आवड -(फक्त जवळीकता):-
भावना आणि निष्ठा असणारा मैत्रीसारखी जवळीकता होय.
२) अद् भुतरम्य प्रेम -( जवळीकता + उत्कटता )
एकमेकांबद्दल शारीरिक प्रेम असणारे परंतु जबाबदारीची जाणीव नसते.
३) सहवास प्रेम -(जवळीकता + बांधिलकी)
जबाबदारीने स्वीकार केलेली दीर्घकाळाची मैत्री .
४) भुरळ घालणारे प्रेम -(फक्त उत्कटता):-
जवळीकता आणि जबाबदारी नसताना पहिल्या भेटीत झालेले प्रेम.
५) पोकळ प्रेम -(फक्त बांधिलकी):-
लैंगिक आकर्षण व जवळीकता नसताना देखील एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्याचा घेतलेला निर्णय.
६) पोरकट प्रेम -(बांधिलकी + उत्कटता):-
जवळीकता निर्माण होण्यासाठी वेळ न देताच झपाट्याने निर्माण झालेले प्रेम व थोडीशी ओळख असणाऱ्या व्यक्तींशी होणारे उथळ प्रेम.
७) परिपूर्ण प्रेम -(जवळीकता + उत्कटता + बांधिलकी):-
हे तिन्हीही प्रकार ज्या प्रेमात येतात, त्यांचे प्रेम परिपूर्ण असते, यालाच आदर्श प्रेम म्हणतात.
पण अशा प्रकारचे प्रेम सहजासहजी होत नाही व सहजासहजी साध्यदेखील होत नाही. प्रत्येकाचे प्रेम हे कोणत्या ना कोणत्या प्रकारांमध्ये येतच असते. जर प्रत्येक प्रेमीयुगलांनी आपल्या प्रेमाचे व नातेसंबंधाचे योग्य आत्मनिरीक्षण करुन पाहिले तर आपले प्रेम कोणत्या पायरीवर आहे आणि आपण कसे यशस्वी करु शकतो. याकडे विशेष लक्ष देता येईल. Over all फक्त (१४ फेब्रुवारी ) व्हँलेंटाइन डे आला म्हणजे आपले प्रेम व्यक्त करण्याची वेळ आली असे काहींना वाटते. खरे प्रेम करणाऱ्यांना व्यक्त करण्याची गरज पडत नाही. प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यांमधुन ते सहज शक्य जाणवते. प्रत्येकाने प्रेम केलेच पाहिजे असे नाही आणि प्रेम हे ठरवून तर मुळीच करु नये. प्रेम ही अशी भावना आहे की, सहवासातून, वागण्या-बोलण्यातून आपोआपच होत-जात असते, यालाच खऱ्या प्रेमाची उपमा देता येईल.
°°°°°°°°°°°°°°° संकलन °°°°°°°°°°°°°°°
अरुण सुमनबाई कवरसिंग चव्हाण
( एम.ए.अर्थशास्त्र )
एल.एल.बी.,पीजी.डी.आय.पी.आर.
सी.सी.डी.सी.अपार्टमेंट पहिला मजला, प्लाँट नं.०२ समर्थ काँलनी,हाँटेल पांचाली जवळ प्रभात चौक ,जळगाव ४२५००१
[email protected]