जळगाव – (जिमाका) – ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउनमध्ये आर्थिक कोंडी होवू नये यासाठी पोस्टामध्ये कार्यरत पोस्टमन तसेच ग्रामीण भागातील शाखा डाकपाल याना ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक’ द्वारा मोबाईल व बायोमेट्रिक डिव्हाईस देण्यात आले आहे. बैंकातील गर्दी कमी करण्यासाठी या सुविधेचा उपयोग करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत २ ते १७ एप्रिल या कालावधीत ६ हजार ३४० लाभार्थ्यांना आधार ऍनेबल्ड पेमेंट सिस्टिमद्वारे ५० लाख ४८ हजार ४६१ रुपयांचे वितरण करण्यात आले. याकरिता टपाल खात्याकडून सामाजिक अंतर, स्वच्छ्ता (Sanitization) यांचे कटाक्षाने पालन केले जात आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी आपापल्या गावातच पोस्टामार्फत लाभ घ्यावा असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकने यांनी केले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बैंकाकडील ६ लाख ५ हजार २२४ पात्र लाभार्थी आहेत. १ लाख ३२ हजार ८६३ लाभार्थ्यांची यादी जिल्हा अग्रणी बैंक कडून इंडिया पोस्ट पेमेंट बैंक कड़े प्राप्त झाली आहे.
पोस्टाच्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक’ मार्फत देण्यात येणा-या ‘आधार ऍनेबल्ड पेमेंट सिस्टिम’ (AePS) सुविधेद्वारे नागरिक स्वतःच्या कोणत्याही बैंक खात्यातील १० हजार पर्यंतची रक्कम पोस्ट ऑफिस मध्ये घेऊ शकतात. त्यासाठी बैंक खात्याला आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. पोस्ट पेमेंट्स बैंकचा ग्राहक असला किंवा नसला तरी त्याचा लाभ घेता येइल. जिल्ह्यात पोस्टाच्या ५३५ शाखा आहेत त्यापैकी ४५४ ग्रामीण भागात तर शहरी व निमशहरी भागात ८१ शाखा आहेत.
“ पैसे काढन्यासाठी ग्राहकाकडे आधार आणि मोबाइल सोबत असणे आवश्यक आहे. ग्राहकांचा आधार क्रमांक व बोटांच्या ठशांचा वापर करून ते पैसे काढू शकतात. पोस्टमन तसेच ग्रामीण भागातील शाखा डाकपाल त्यांच्याजवळ उपलब्ध रक्कमेनुसार ही सुविधा देवू शकतील. –
मनीष तायडे ,
शाखा व्यवस्थापक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक, जळगाव