पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे सर्व जिल्ह्यांना निर्देश
मुंबई दि.23 :- कोविड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवणे आवश्यक आहे. म्हणून टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना अनावश्यक गर्दी टाळावी तसेच पुरेसे सामाजिक अंतर राखून पाण्याचे वितरण करण्यासाठी तातडीने स्थानिक स्तरावर संबंधित गाव/ वाड्यांमध्ये आवश्यक उपाययोजना करावी. असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना शक्यतो सार्वजनिक स्त्रोत/उंचावरील/ भूमिगत पाणी साठवण टाकी अथवा मोठ्या टाक्यांमध्ये टँकर्सचे पाणी साठवून वितरण व्यवस्थेद्वारे पाणीपुरवठा करावा. सार्वजनिक स्त्रोतांमधून पाण्याची गळती होत असल्यास अपवादात्मक स्थितीत पाणी वितरणासाठी छोट्या टाक्या अथवा पर्यायी उपाययोजना राबवाव्यात असे निर्देशही पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी दिले आहेत.