सायबर विश्वात वावरताना ‘डिजिटल सजगता’ हेच प्रभावी सुरक्षा कवच” – पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न
जळगाव (प्रतिनिधी): दिनांक 28 फेब्रुवारी 2026 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत, धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथे 27 व 28 फेब्रुवारी 2026 रोजी ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाच्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी.एस.आय. मुस्तफा मिर्झा बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी होते, तर व्यासपीठावर महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. सुनिता चौधरी व प्रा. डॉ. शाम सोनवणे यांची उपस्थितीत होते.
“सध्याच्या काळात तंत्रज्ञान जितके सोयीचे आहे, तितकेच ते धोकादायकही ठरू शकते. सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या वापरून सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. विशेषतः महाविद्यालयीन युवतींनी सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर करताना ‘डिजिटल हायजीन’ पाळणे आवश्यक आहे. सायबर विश्वात वावरताना तुमची सतर्कता आणि सजगता हेच तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे,” असे प्रतिपादन जळगाव सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुस्तफा मिर्झा यांनी केले. याच बरोबर
‘डिजिटल अरेस्ट’ चा बनाव ओळखा: सीबीआय (CBI), ईडी (ED) किंवा पोलीस अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलद्वारे घाबरवून पैसे उकळणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’ या प्रकाराला बळी पडू नका. कोणतेही शासकीय कार्यालय अशा प्रकारे व्हिडिओ कॉलवर कारवाई करत नाही, तसेच डिजिल अर्रेस्ट ही संकल्पना कायद्यात नमूद नाही , हे मिर्झा यांनी प्रकर्षाने मांडले. सोशल मीडिया प्रायव्हसी: इन्स्टाग्राम, फेसबुकवर फोटो शेअर करताना ‘लोकेशन टॅगिंग’ टाळावे आणि अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला. आर्थिक सुरक्षा (गोल्डन अवर): सायबर फसवणूक झाल्यास पहिल्या एक तासात (Golden Hour) 1930 या हेल्पलाईनवर तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम गोठवण्याची शक्यता अधिक असते, याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. समाजकार्याच्या विद्यार्थ्यांची भूमिका: बी.एस.डब्ल्यू. व एम.एस.डब्ल्यू. च्या विद्यार्थ्यांनी गावोगावी जाऊन ‘सायबर दूत’ म्हणून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात सायबर साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. डॉ. सुनिता चौधरी यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी हर्षदा पाटील हिने केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक ग्रंथपाल गायत्री असोदेकर यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ भूषण भामटेराजपूत प्रा. डॉ. शाम सोनवणे, प्रा. डॉ. यशवंत महाजन, प्रा. डॉ. दीपक महाजन तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.










