जळगाव :- शहरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे . सलग दुसऱ्या दिवशी तालुका व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाेरट्यांनी चार घरे फाेडली. यात हजारो रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. आसोदा रेल्वेगेट परिसरातील एका कॉलनीत तीन तर शिवाजीनगरातील अमन पार्कमध्ये एक घर चोरट्यांनी फोडले. गुरुवारी रात्री प्रजापतनगरात तीन घरे फोडली होती.
असोदा रेल्वेगेटजवळ असलेल्या कलावसंत नगरात महादेव विठ्ठल भोळे (वय ६५) हे कुटुंबासह राहतात. रात्री ते घरात झोपलेले असताना पहाटे ३.३०च्या सुमारास चोरट्यांनी खिडकीतून हात टाकून त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी आतून उघडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करत दीड हजार रुपये असलेली पर्स चोरून नेली. पहाटे ४ वाजता भोळे कुटुंबीय झोपेतून उठले असता दरवाजा उघडा दिसल्याने घडलेला प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी पर्स घराच्या मागील बाजूला फेकून पळ काढला. घराच्या बाहेर असलेला बल्ब चोरट्यांनी काढून घेतला तर त्यांचा मुलगा लोकेश भोळे याच्या दुचाकीच्या (एमएच १९ डीजी ८६२२) पेट्रोल नळ्या, वायर कापून फेकल्या व पेट्रोल चोरले. भोळे यांच्या घरातून गेल्यावर्षीही एक मोबाइल अशाचप्रकारे चोरीस गेला आहे. दरम्यान, शहरात चाेरीचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून पाेलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी हाेत आहे .
शिवाजीनगरातील अमन पार्कमध्ये बंद घर फोडले
शिवाजीनगरातील अमन पार्कमध्ये प्लॉट क्रमांक ३२ मध्ये मोहंमद अली इस्माईल अली सय्यद हे परिवारासह राहतात. ते खासगी कंपनीत कामाला आहेत. मोहंमद अली हे परिवारासह नातेवाइकांना भेटण्यासाठी मंगळवारी धुळे येथे गेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या कंपाउंडच्या गेटवरून उडी मारली. मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट फोडत १२ हजार लंपास केले. शेख यांचा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, त्याची शैक्षणिक फी भरण्यासाठी ही रक्कम त्यांनी कपाटात ठेवली होती. याच कपाटातील एका कप्प्यात रोख रक्कम व सोने असा दीड लाखांचा ऐवज होता. चोरट्यांनी हा कप्पा न तपासल्याने त्यातील रक्कम व दागिने सुरक्षित राहिले.
घराला कडीकोयंडा लावून दुकानात चोरी
कलावसंत नगरातच मूलचंद देविदास साळुंखे यांचे किराणा दुकान आहे. ते कुटुंबासह घरात झोपलेले असताना चोरट्यांनी घराला बाहेरून कडीकाेयंडा बंद केला. तर घराच्या बाहेर असलेल्या किराणा दुकानाचे कुलूप तोडत दुकानात प्रवेश केला. दुकानातील सामान अस्ताव्यस्त करून गल्ल्यातील दीड हजार रुपये रोख लंपास करीत त्यांनी पळ काढला.
कुटुंबीय वरच्या मजल्यावर, खाली चोरट्यांचा डल्ला
मुलचंद साळुंखे यांच्या घरामागेच शरद त्र्यंबक अहिरे हे परिवारासह राहतात. अहिरे हे घराच्या वरील मजल्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी खालील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. किचनमध्ये ठेवलेली दीडशे रुपयांची रक्कम घेऊन त्यांनी पळ काढला. दरम्यान, चोरट्यांनी कलावसंत नगरात धुमाकूळ घातल्यानंतर आसोदा रेल्वेगेट परिसरातून पळून गेले. या वेळी काही नागरिकांसह रेल्वेगेटवरील कर्मचाऱ्यास तीन चोरटे पळून जाताना दिसले आहे .