
पारोळा- (प्रतिनिधी)-दि. ६ ऑगस्ट २०२५
बांबू लागवड प्रकरणात शेतकऱ्याकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) मनोज बबनराव कापूरे, लिपिक निलेश मोतीलाल चांदणे आणि कंत्राटी चालक कैलास भरत पाटील या तिघाही आरोपींना पारोळा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड सुनावली आहे.

शेतकऱ्याच्या शेतजमिनीत अमृत महोत्सवी वृक्ष लागवडीसाठी मंजुरी मिळवून देण्याच्या मोबदल्यात आरोपींनी ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३६ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली गेली. सदर रक्कम कैलास पाटील या कंत्राटी कर्मचाऱ्याने पंचासमक्ष स्वीकारताच तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या पथकाने दिनांक ५ रोजी रंगेहात अटक करण्यात आली आहे.

घटनेचा तपशील

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी सडावण शिवारातील जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडे अर्ज केला होता. त्या मंजुरीसाठी RFO मनोज कापूरे यांनी प्रत्येकी १०,००० रुपये प्रमाणे चार फाईल्ससाठी ४०,००० रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदाराने ५ ऑगस्ट रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केल्यानंतर, सापळा रचण्यात आला. त्यानुसार आरोपींनी ३५,००० रुपये स्वतःसाठी व १,००० रुपये लिपिकासाठी अशी रक्कम निश्चित केली होती. सदर रक्कम कैलास पाटील याने स्वीकारली.

लीस तपास सुरू

तिघाही आरोपींविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे (ला.प्र.वि., जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे.

या प्रकरणात लाच स्वीकारण्यामागील साखळी, मंजुरी प्रक्रियेतील अनियमितता, तसेच इतर संभाव्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रिमांडची मागणी केली होती. त्यामुळे दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सपाटून परिणामकारक कारवाई

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर, तसेच पोलीस अधीक्षक मा. श्री. भारत तांगडे आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असुन या कारवाईमुळे सामाजिक वनीकरण विभागातील व्यवहारांतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, लाचखोरीविरोधातील प्रशासनाची गंभीर भूमिका अधोरेखित झाली आहे.











