मुंबई, दि. १८: राज्यात नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यू, झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी, जखमी नागरिकांना मदत मिळावी यासाठी शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आरहित करण्याबाबत यापूर्वीच परवानगी दिली आहे. त्यानुसार संबधित जिल्हाधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले, अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, घरे पूर्णपणे बाधित किंवा अंशतः बाधित झाल्यास त्याचेही तातडीने पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी. तसेच टपरीधारक, छोटे व्यावसायिक यांचे नुकसान झाल्यास अशा बाधितांचे तातडीने पंचनामे करून या बाधितांना जलद मदत देण्यात यावी. ही मदत त्यांना तातडीने मिळावी यासाठीही शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आहरित करण्यास शासनाने या पूर्वीच परवानगी दिली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या बाधितांना तात्काळ मदत मिळावी, त्यांना दिलासा देण्याचे प्रशासनाने काम करावे. तसेच या बाधितांना शासन निकषानुसार मदत करावी, असे निर्देशही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी दिले आहेत.











