लोहार ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

“कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा… मरावे परी कीर्ती रूपे उरावे,”या युक्तीचा प्रत्यय आज लोहारा ग्रामस्थांना आला. गावाच्या विकासासाठी आयुष्य वेचणारे विद्यमान स्व. सरपंच अक्षय कुमार जैस्वाल आज आपल्यात नसले, तरी त्यांनी पाहिलेले स्वप्न मात्र प्रत्यक्षात उतरले आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेल्या जलजीवन पाणी योजनेमुळे बागुल येथून गावात पाणीपुरवठा सुरू झाला असून संपूर्ण गाव भावनांनी ओथांबून गेले आहे.

गावाच्या प्रगतीचा ध्यास घेतलेल्या जैस्वाल यांनी जलजीवन योजनेसाठी अक्षरश: अहोरात्र मेहनत घेतली कागदोपत्री अडथळे शासकीय प्रक्रिया ,निधीची जुळवाजुळव अशा अनेक संकटांना तोंड देत त्यांनी ग्रामपंचायत टीमच्या सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नील नेला. आज नळातून वाहणारे पाणी म्हणजे केवळ सुविधा नसून त्यांच्या जिद्दीचे आणि दूरदृष्टीचे जिवंत स्मारक ठरले आहे.

दुर्दैवाने, हे यश पाहण्यासाठी “भाऊ” आज आपल्यात नाहीत ही खंत प्रत्येकाच्या मनात दाटून आली. पाणीपुरवठा सुरू झाल्याची बातमी गावभर पसरतात एका बाजूला पाणी पुरवठा योजनेच्या टाकीत पडणारे घो, घो पाणी व दुसरीकडे अनेकांच्या डोळ्यात दाटून आलेले अश्रूंचा पुर. कारण हे स्वप्न साकार झाले, पण ते पाहायला ज्यांनी आयुष्य झिंजवले तेच आपल्यात नाहीत,” अशी हळहळ ग्रामस्थांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जलजीवन योजना अद्याप अपूर्ण असताना लोहारा गावांनी हा टप्पा गाठला, ही बाब विशेष ठरत आहे. यामागे स्व. जैस्वाल यांचे नेतृत्व नियोजन आणि गावकऱ्यांचा विश्वास महत्त्वाचा ठरल्याचे नागरिक सांगतात. ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण टीमने दिलेल्या साथीलाही ग्रामस्थांनी मनःपूर्वक दाद दिली.

गावाच्या इतिहासात “पाण्याची समस्या” हा कायमचा विषय होता. मात्र आज त्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याने लोहारा नव्या विकासापर्वात प्रवेश करत आहे. त्यामुळे स्व. सरपंचांना ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने “लोहारा गावाचे भगीरथ”अशी उपाधी दिली आहे. कारण “तुम्ही किती दिवस जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला अधिक महत्त्व असते”, हे वाक्य त्यांच्या आयुष्याकडे पाहिल्यावर सार्थ वाटते. अल्प आयुष्यातही त्यांनी केलेले कार्य त्यांना कीर्ती रूपाने अमर करून गेले आहे.

आज प्रत्येक घरात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत स्व. अक्षय कुमार जैयस्वाल यांच्या आठवणी वाहत राहतील, आणि लोहारा गाव यांच्या कार्याचे ऋण सदैव मानत राहील. अखेर आपल्या लोहारा भागातील भाग्यविधाते माननीय मंत्री गिरीशभाऊ महाजन माननीय मंत्री गुलाबराव पाटील पाचोरा नगरीचे शिल्पकार आमदार किशोर आप्पा पाटील संबंधित अधिकारी तसेच लोहारा गावातील सरपंच स्व. अक्षयकुमार जैस्वाल यांच्या सातत्याने व पाठपुरव्याने व वेळोवेळी घेतलेल्या आथक परिश्रमाने वाघुर धरणातील लोहारा गावासाठी असलेल्या पाईपलाईन पूर्णत्वास आली. व लोहारा गावासाठी कायमस्वरूपी पाण्याची अडचण मिटवण्यात मोलाचा वाटा ठेवून या जगाचा निरोप घेतला, खरं म्हणजे या पाईपलाईन मध्ये अनेक प्रकारच्या अडचणी अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या अडचणींना तोंड देऊन गावागावावरून नागरिकांना तोंड देऊन रोटवद तालुका जामनेर यासारख्या ठिकाणी पाण्याच्या टाकीला देखील स्थानिक विरोधामधून मार्ग काढून इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधक असून देखील कुठल्याही प्रकारे श्रेय वादाच्या लढाईमध्ये न राहता प्रसिद्धीच्या प्रवाहात न येता सातत्य ठेवून हा जलजीवन मिशनचा लढा ज्यांच्या कारकिर्दीत यशस्वी झाला. त्याचे नाव आठवणीने घ्यावेसे वाटते ते मंत्री गिरीशभाऊ महाजन महोदय गुलाबराव पाटील व स्व.सरपंच अक्षय कुमार जैस्वाल यांच्या प्रयत्नामुळेच आज लोहारा या गावाचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गे लावला सर्व आमचे भाऊ आहेतच खूप खूप धन्यवाद भाऊ तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही सरपंच अक्षय भाऊ जैस्वाल तुम्ही या पाईपलाईन मध्ये अनेक वेळ देऊन तसेच रात्रंदिवस सक्रिय सहभाग घेऊन गावासाठी हा विषय पूर्णत्वास आणून आज तुम्ही या जगाचा निरोप घेतला खरंच संपूर्ण परिसर व लोहारा गाव हा तुमचा सदैव ऋणी राहील भावपूर्ण श्रद्धांजली शेवटी असंच म्हणावं लागेल, जो ही आवडे देवा तोही सर्वांना आवडे …!










