जळगाव – आज दि १६ जुलै खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. संपूर्ण भारतातून जवळपास 3 तास हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे. मंगळवारी रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी हे ग्रहण सुरु होईल व पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे.
चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो,तेव्हा चंद्रग्रहण घडून येते.अशावेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते.पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो.त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते, तर काही वेळा चंद्र काहीसा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते. उद्या भारताबरोबरच, अफगाणिस्तान,तुर्की, युक्रेन, इराण, इराक,सौदी अरब,पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्टिका या देशात सुद्धा हे चंद्र ग्रहण दिसणार आहे.शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे वेध ९ तास आधी सुरु होतात.त्यानुसार उद्या मंगळवार दि १६ जुलै रोजी रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी वेध सुरु होणार.चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते,परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही.सूर्य,पृथ्वी,व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच चंद्रग्रहण होते.खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे इतका असतो.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत.यात शुभ-अशुभ असे काहीही नसते.सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे.या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते.म्हणून मनात कोणतीही भीती अथवा अंधश्रद्धा ठेवून चंद्रग्रहण बघणे टाळू नका.चंद्रग्रहणाचा आनंद घ्या.
मनोज भालेराव (शिक्षक)
मो.८४२१४६५५६१
प्रगती विद्यामंदिर जळगांव