पत्रकारांना जीवे ठार मारण्याची धमकी;बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटलांसह 6 जणांवर गुन्हा दाखल
जळगाव-(प्रतिनिधी) -येथील दि जळगाव पिपल्स को-ऑप बँकेच्या चेअरमनसह ७ अधिकारी व कर्मचार्यांवर शहर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकारांना धमकावणे व बँकेच्या विरुध्द बातम्या प्रसिध्द करु नये यासाठी आटापिटा करणार्या चेअरमन भालचंद्र पाटील सह ७ अधिकार्यांविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांचे व नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी येथील दि जळगाव पिपल्स को-ऑफ बँकेस रिझर्व्ह बँकेने २५ लाखाचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी दै. बातमीदारसह बहुसंख्य प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाने वस्तुस्थिती जन्य बातम्या प्रसारीत केल्या होत्या व यासंदर्भात बँकेचा खुलासा देखील प्रसिध्द केला होता. याचा राग येऊन, आकस बुध्दिने दि. ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी दै. बातमीदारचे संपादक हेमंत पाटील यांच्या विरुध्द शहर पोलीस स्टेशनला खोटी फिर्याद देवून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार बँकेचे चेअरमन संचालक मंडळ व प्रशासनाने केला असल्याचे हेमंत पाटील यांनी साांगितले. तसेच सोशल मिडियावर यासंदर्भातील पोस्ट व्हायरल करुन बँकेच्या प्रशासनाने आकांडतांडव करीत या प्रकारच्या बातम्या प्रसिध्द केल्यास बँक प्रशासनाकडून अप्रत्यक्षपणे कायदेशीर कारवाईची धमकी देत बँक ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणार्या बातम्या प्रसिध्द करु नये या कारणास्तव वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार केला असल्याचे देेखी त्यांनी सांगितले. या प्रकरणी दै.बातमीदार चे संपादक हेमंत पाटील यांनी शुक्रवार दि. १ नोव्हेंबर २०१९ रोजी फिर्याद दिल्याने चेअरमन भालचंद्र पाटील, दिलीप देशमुख, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, राजेंद्र सोनार, सतिष लिंगे, सागर बारी व अन्य एका विरुध्द भादंवि कलम १४३, ३२३, ५०१, ५०४, ५०६ प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय उल्हास चर्हाटे हे पुढील तपास करीत आहेत.