जळगांव(चेतन निंबोळकर)- भारतात व्यसनामुळे युवा पिढी वाया जात आहे. व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असून त्यापासून परावृत्त होण्याकडे आजच्या तरुणांचा कल नाही. आजचा युवक हा देशाचे भविष्य आहे. मात्र व्यसनाधीन युवा वर्ग देश कसा सांभाळणार? असा प्रश्न पडतो. महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणारे युवक रोज महाविद्यालयाच्या आवारात सिगारेट, विमल आदी सेवन करतात. यातून शासनाचा शाळा महाविद्यालयांपासून १०० मीटर पर्यंत कोणतेही व्यसन वस्तू मिळू नये अन्यथा कारवाई होईल या कायद्याची धज्जीया उडतांना सुद्धा दिसत आहे. कारण शाळा महाविद्यालयांच्या आवारात सर्रासपणे विमल, गुटखा, व सिगारेट विकल्या जात आहेत. व याकडे महाविद्यालये देखील दुर्लक्ष करीत आहेत. याकडे महाविद्यालयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत शहरातील पालक व्यक्त करीत आहे. शहरातील नामवंत महाविद्यालयांच्या गुटखा विक्री सुरू असून, अन्न आणि औषध प्रशासन व पोलिसांनी कानाडोळा केल्याने युवा मुले व्यसनांच्या विळख्यात सापडत आहेत. समाजसेवी संस्थांनी हा विषय हाती घेणे, आवश्यक आहे. अन्यथा व्यसनाच्या विनाशकारी जाळ्यामध्ये अडकलेली युवा पिढी या महान देशाचा गाडा ताकदीने ओढून नेण्यापूर्वीच संपून जाईल. असे मत देखील पालकांनी यावेळी व्यक्त केले.