अहमदनगर (प्रतिनिधी)- आम्ही त्यांना चालत नाही, त्यामुळे तेही आम्हाला चालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत माजी खासदार तथा भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी अनिल राठोड यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. युतीच्या जागा वाटपात नगरची जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली जाईल, असे सांगत गांधी यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकत राठोड युतीत नको असा सूर गांधी यांनी आवळला.
गेल्या 25 वर्षात नगरचा कोणताही विकास झाला. नगर विकासासाठी आमदारकीची जागा युतीच्या जागा वाटपात भाजपला मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जोरदार मागणी करणार आहे. युती झाली तर अनिल राठोड हे उमेदवार म्हणून चालणार नाही, अशी थेट उघड भूमिका माजी खासदार तथा भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी पत्रकारांसमोर मांडली.
महाजनादेश यात्रेची माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार दिलीप गांधी बोलत होते. नगरची जागा भाजपला मिळावी यासाठी ठराव केला आहे. मुख्यमंत्र्यांना तसे निवेदन दिले जाणार आहे. नगरची जागा भाजपला मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच गांधी यांनी राठोड यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहिर होण्यापूवींर्च राठोड यांनी दिलीप गांधी नावाला विरोध केल्याची आठवण सांगतानाच आता आमचाही राठोड यांच्या नावाला विरोध असल्याची भूमिका गांधी यांनी मांडली.
तीनशे बाईकची रॅली
नगर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 300 कोटी रुपये निधी दिला आहे. त्यांच्या महाराष्ट्रभर सुरू झालेल्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करणे हे नगरवासीयांचे कर्तव्य असून, 13 तारखेला येणार्या महाजनादेश यात्रेचे नगरमध्ये शाही स्वागत करण्यात येणार असून त्यांच्या रथासमोर तिनशे बाईक असेल असे नियोजन असल्याचे गांधी यांनी सांगितले.