जळगाव – (प्रतिनिधी )- भारतीय सैन्य दलातील जवानांची युद्धजन्य परिस्थितीत किंवा शहीद झाल्यानंतर आपणा सर्वांना आठवण येते….मात्र त्यांच्या पत्नींची दखल नंतर सहसा घेतली जात नाही!
याला अपवाद ठरला आहे एक कार्यक्रम….अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार गावातील नगर पाथर्डी रोडवरील ईएमई कॉलनीतील रहिवासी असलेल्या सौ.रेखा अनिल तोडकर यांनी मकर संक्रांति निमित्त सैन्य दलातील जवानांच्या पत्नी तसेच वीर पत्नी यांच्यासाठी विशेष हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता.
महिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या आदर्श वीरपत्नी अंबिका भोंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ३५ महिलांचा कार्यक्रमात सहभाग होता. त्या सर्वांना हळदीकुंकू, संक्रांतीचे वाण, तिळगुळ आणि स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. तसेच सर्व महिलांचे विनामूल्य आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. पुणे येथे डिझायनर इंजिनिअर असलेल्या कु.श्रेया अनिल तोडकर हिने सूत्रसंचालन तर प्रास्ताविक पल्लवी सचिन बोरुडे यांनी केले. सेवानिवृत्त सैनिक स्व. मोहन तोडकर यांचा देशभक्तीचा वारसा पुढे नेणारे श्री अनिल मोहन तोडकर यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.
या भावस्पर्शी कार्यक्रमाच्या आयोजक सौ.रेखा अनिल तोडकर या जळगाव येथील सौ.रेणूका रितेश माळी यांच्या भगिनी आहेत. आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे सैनिक कुटुंबातील सर्व महिला भारावून गेल्या होत्या.