सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यजत्रेमुळे सागर पार्कचे मैदानाचे झाले आनंदमेळ्यात परिवर्तन
जळगाव-(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध सेवाव्रती संस्था व सेवामहर्षींच्या कार्याला समाजासमोर घेऊन येणारा अनोखा उपक्रम ‘मल्हार हेल्प फेअर-३’ च्या दुसऱ्या दिवशी जळगावकरांनी मदतीचे हजारो हात साकारतांना पाहिले. सागर पार्क मैदानावर सुरु असलेल्या या तीन दिवसीय सोहळ्यात रविवारी जळगावकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून हेल्प-फेअरमध्ये शामिल सेवाभावी संस्थांना कौतुकाची थाप दिली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच खाद्यजत्रेची मेजवानी देणाऱ्या या सोहळ्यामुळे जळगावकरांची संडे नाईट आनांदायक ठरली.
हेल्प फेअरच्या दुसऱ्या दिवशी शहरातल्या विविध शाळा, संस्थांनी सादरीकरण केले. दीपस्तंभ फाऊंडेशनचे मनोबल, लिटिल अँजेल, मोईन बँड, के. के. इंटरनॅशनल, आर. आर. शाळा, तलाश ग्रुप यांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद आमदार चंदूभाई पटेल यांनी हेल्प फेअरला भेट देऊन विविध सामाजिक संस्थांची सविस्तर माहिती जाणून घेतली व चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याचे कौतुक केले. ते म्हणाले कि हेल्प-फेअर सारखे उपक्रम समाजाला दिशा देणारे ठरतात व जागरूक नागरिकांचे सृजन करतात. भारतात अनेक सामाजिक समस्या आहेत ज्यांचे निर्मूलन करणे ही आपली नैतिक जवाबदारी आहे. हेल्प-फेअर हे नक्कीच प्रेरणादायी असून विशेषतः तरुणांना दिशा देणारे ठरेल.
प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. यावेळी पर्यावरण संवर्धन या विषयावर बोलतांना ते म्हणाले की दिवसेंदिवस वाढणाऱ्या पर्यावरण समस्या हा धोक्याचा इशारा आहे व याकडे गांभीर्याने लक्ष्य द्यायला हवे. याला वाढती लोकसंख्या हे मुख्य कारण असून यामुळे झाडांची कत्तल थांबायला पाहिजे. सरकार तर्फे या संदर्भात योग्य ते उपाय केले जात असून एक जवाबदार भारतीय म्हणून सर्वांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. हेल्प-फेअरमध्ये सहभागी पर्यावरण संबंधित संस्थांचा उल्लेख करत त्यांनी केलेल्या कार्याचे डॉ. बी. एन. पाटील यांनी कौतुक केले. शिवाय त्यांनी सर्वांना सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा सल्ला दिला. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या लोकांना उत्पन्न ही चांगले होते व ते पीक देखील तितकेच सात्विक होते पण वाढत्या केमिकल्स च्या उपयोगाने आरोग्य व्यवस्था बाधित झाली आहे असे ते म्हणाले. यावेळी मंचावर हेल्प-फेअरचे कमिटीचे भरत अमळकर, प्रकाश चौबे, गनी मेनन, अमर कुकरेजा, नंदू अडवाणी, चंद्रशेखर नेवे, प्रशांत मल्हारा व आनंद मल्हारा आदी उपस्थित होते.
संस्थां चालकांसाठी कार्यशाळा
हेल्प-फेअर ३ मध्ये सहभागी विविध संस्थांच्या संचालकांसाठी धर्मदाय नोंदणी कार्यालय अधीक्षक विश्वनाथ तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वयंसेवी संस्था- कायदेशीर पूर्तता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना विश्वनाथ तायडे यांनी संस्था नोंदणी, प्रशासकीय कामात येणाऱ्या समस्या, कायदेशीर तरतुदी व त्यांची पूर्तता, संस्थाचालकांचे अधिकार व कर्तव्ये, जीएसटी, टीडीएसचे नियम इ. सारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी संस्था चालकांतर्फे विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांचे उत्तर देतांना सरकारच्या संस्थेप्रति असणाऱ्या जवाबदाऱ्या त्यांनी समजावून सांगितल्या व संस्थांचे मनोगत ऐकून आवश्यक ते बदल घडवण्याच्या दृष्टीने सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
१७ रोजी होणार दुसऱ्या कार्यशाळेचे आयोजन
आज आयोजित कार्यशाळेत मुंबई येथील शैलेश निपुनगे हे ‘केंद्रीय बजेट व स्वयंसेवी संस्था’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यशाळा हॉटेल कोझी कॉटेज येथे सकाळी १० ते १ या वेळात पार पडणार आहे.