जळगाव-(प्रतिनिधी ) – प्रा. शेखर सोनाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक बौद्धिक व्यासपीठांतर्गत राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथील धांडे सभागृहात करण्यात आले आहे.
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली असून विविध ऐतिहासिक, सामाजिक व समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेले विषय पुढीलप्रमाणे आहेत : (१) शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेची प्रेरणा आणि प्रासंगिकता, (२) संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे : महत्त्व आणि प्रासंगिकता, (३) समाजवाद : राष्ट्र उभारणीची पूर्वअट, (४) लोकशाहीतील असहमतीचे महत्त्व, (५) भारतातील मूलभूत समस्या आणि २०४७ चा विकसित भारत, (६) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोजगाराचे भवितव्य.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ५,००० रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकास ३,००० रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तर तृतीय क्रमांकास २,००० रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला असून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथील तत्त्वज्ञान अभ्यासक प्रा. शरद बाविस्कर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक चिंतन, सामाजिक भान आणि प्रभावी वक्तृत्वकौशल्य विकसित व्हावे, हा मुख्य उद्देश असून राज्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.










