जळगांव(प्रतिनिधी)- झाडांना मानवाच्या जीवनात खूप महत्त्व आहे. जंगले आणि वने ही निसर्गाच्या उत्तम सौंदर्याचा साठा आहेत. या जंगलांमधून पोसणारे निसर्गाचे स्वरूप हे मानवाला प्रेरित करते. जर या धरतीवर वन किंवा जंगल नसतील तर मानवाला आपले जीवन जगणे कठीण आहे. त्यातच मानव हा आपल्या स्वार्थापोटी निसर्गाशी खेळ करत आहे, त्याचेच विपरीत परिणाम हे मानवच भोगत आहे. मानव जर असाच निसर्गाशी खेळ करू लागला तर येणाऱ्या पिढीला फार मोठ्या विपरीत परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे निसर्ग साखळीची तुटलेली भर भरून काढण्यासाठी कृती फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाभरात विविध ठिकाणी “वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन” ही मोहीम राबविली जात आहे. याचाच एक भाग म्हणून कृती फाऊंडेशनच्या वतीने जानोरी ता. रावेर येथील दफनभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. याबाबत सविस्तर असे की, जानोरी गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला.
गावात अवकाळी पाऊस, प्राणवायू कमी होणे, हिरवेगार शेत नष्ट होणे या सगळ्या गोष्टींचा विचार करता गावकऱ्यांना असे समजले की गावात झाडांचे प्रमाण खूप कमी झाले आहे आणि यामुळे खूप कठीण परिस्थितीनं सामोरं जावं लागतं आहे. म्हणूनच म्हणूनच गावकऱ्यांनी एकमताने कृती फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत फाऊंडेशनच्या साहाय्याने गावात झाडे लावायचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गावातील सगळे तरुण, गावकरी व वयस्कर लोक देखील हजर होते. गावातल्या सरपंचानी सर्वात पहिले झाड लावून कार्यक्रमाला सुरवात केली. यात हवा शुद्ध ठेवत ऑक्सिजन देणाऱ्या तसेच वेगवेगळी फुलझाडे, फळझाडे या सगळ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून पोलीस बिनतारी संदेश विभागाचे व फाऊंडेशन कार्यध्यक्ष अमित माळी, सलीम तडवी, चेतन निंबोळकर उपस्थित होते. सर्वप्रथम अमित माळी यांच्यावतीने उपस्थितांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली. नंतर गावातील दफनभूमीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मानव वृक्षांची तोड करून इमारती बांधण्यासाठी तसेच कारखाने वाढवून सिमेंटचे जंगल उभे करत आहे. जंगल तोड होत असल्यामुळे जंगलांचा नाश होत आहे. तसेच जमीन खराब होत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आपण सर्वानी जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. नुसती झाडे लावून फायदा नाही तर त्यांचे जतन केले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. असे अमित माळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. झालेल्या उपक्रमामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून “झाडे लावा, झाडे जगवा” हे वाक्य सगळे गावकरी आनंदाने बोलत होते. सदर उपक्रम फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष डी.टी. महाजन, अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी. महाजन, नाशिक पोलीस बिनतारी संदेश विभागाचे स.फौ. अफजल तडवी यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला असून या उपक्रमाला हरित सेना मास्टर ट्रेनर प्रवीण पाटील, वनीकरण विभागाचे वसंत सपकाळे, कृषी विभाग(सेवा.) साबीर तडवी, कर विभाग(सेवा.) दिलदार तडवी, ग्राम रोजगार सेवक नवाज तडवी यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रसंगी सरपंच नजमा तडवी, उपसरपंच गफूर तडवी, सावखा तडवी, साहिल तडवी, दाऊद तडवी, मुक्कदर तडवी, युसूफ तडवी, आसिफ तडवी, मुशीर तडवी, लुकमान तडवी, जुम्मा तडवी, युसूफ तडवी, रेहान तडवी, रोनक तडवी, युसूफ तडवी, फरीद तडवी, समीर तडवी आदी उपस्थित होते.